VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्याकडून सत्कार; तरुणांसाठी ठरले प्रेरणास्थान,
गडचिरोली ,०७ मार्च २०२६::- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत देशात ५१४ वी रँक मिळवत रजत वाळके यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नक्षलग्रस्त आणि अति दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातून अशी कामगिरी करणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध तयारी आणि दृढ निश्चय यांच्या बळावर रजत वाळके यांनी हे यश मिळवले. मर्यादित साधनसामग्री, ग्रामीण वातावरण आणि अनेक अडचणींवर मात करत त्यांनी गाठलेले हे यश आज गडचिरोली जिल्ह्यातील हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल नगरपरिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी रजत वाळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक सागर अरुणजी निंबोरकर तसेच नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी सांगितले की, “गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि अति दुर्गम जिल्ह्यातून यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. रजत वाळके यांनी केलेली ही कामगिरी जिल्ह्याच्या तरुणांसाठी आशेचा किरण आहे. त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांना मोठी प्रेरणा मिळेल आणि तेही मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करतील.”
रजत वाळके यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण मेहनतीला दिले. “प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा अवघड राहत नाही,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्या या यशामुळे कुटुंब, मित्रपरिवार तसेच गडचिरोली शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातून पुढे येत रजत वाळके यांनी मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण जिल्ह्याच्या अभिमानाची बाब ठरत आहे. भविष्यात ते प्रशासनात कार्य करताना समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वासही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
