VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख चामोर्शी विजय लाड यांची नवीन पुलाची मागणी,
अपघाताची वाट पाहते का प्रशासन?
जिर्ण पुलामुळे नागरिकांमध्ये भीती;वारंवार तक्रारींनंतरही दुरुस्ती नाही,
नहरात पडून अपघाताच्या घटना; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम,
गडचिरोली/चामोर्शी, २३ मार्च २०२६::- तालुक्यातील फोकुर्डी-नवेगाव-मुरखडा मार्गावरील दिनाधरण नहरावर असलेला पूल अत्यंत जिर्ण अवस्थेत असून, संबंधित विभागाकडून या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
या पुलाच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर पूल अत्यंत अरुंद असून त्यावर आडवे वळण असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा पूल धोक्याचा ठरत असून, यापूर्वी काही दुचाकीस्वार नहरात पडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
स्थानिक नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असूनही पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच धोकादायक होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन जुन्या पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन व रुंद पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी काँग्रेस सोशल मिडिया प्रमुख चामोर्शी येथील विजय लाड यांनी केली आहे.
लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला गेला नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
