Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliपंतप्रधानांच्या 'मन की बात' मध्ये गडचिरोलीच्या काटेझरी गावातील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख: माओवादग्रस्त...

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये गडचिरोलीच्या काटेझरी गावातील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख: माओवादग्रस्त भागात विकासाची बस पोहोचली…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, २६ मे २०२५::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी गावाचा विशेष उल्लेख करत, माओवादग्रस्त भागांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. काटेझरी गावात २३ मार्च २०२५ रोजी पहिल्यांदाच बस पोहोचल्याच्या घटनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले, आणि या घटनेने त्या भागातील विकासाची गाथा अधोरेखित केली.पंतप्रधानांनी सांगितले की, “मी तुम्हाला, जिथे पहिल्यांदाच एक बस पोहोचली, अशा एका गावाबद्दल आज सांगू इच्छितो, त्या दिवसाची त्या गावातले लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते.” त्यांनी पुढे म्हटले की, जेव्हा गावात पहिल्यांदा बस आली, तेव्हा लोकांनी ढोल-नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.काटेझरी गावात पक्की सडक असूनही, लोकांना वाहतुकीची गरज असूनही यापूर्वी कधीही तिथे बस सेवा सुरू झाली नव्हती.

याचे मुख्य कारण म्हणजे हा गाव माओवादी हिंसाचारानं प्रभावित होता. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, “ही जागा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि या गावाचं नाव आहे काटेझरी.”काटेझरीमध्ये झालेल्या या बदलाचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आता या भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. माओवादाविरुद्धच्या सामूहिक लढाईमुळे आता अशा दुर्गम आणि माओवादग्रस्त भागांपर्यंतही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्या आहेत, हे या घटनेतून सिद्ध होते.गावकऱ्यांनी सांगितले की, बस आल्यानं त्यांचं जीवन अधिक सोपं होईल. ही बस सेवा केवळ वाहतुकीचे साधन नसून, विकासाची, सुरक्षिततेची आणि सामान्य जीवनाकडे परतण्याची एक आशा घेऊन आली आहे. दीर्घकाळापासून उपेक्षित असलेल्या या भागाला आता मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे हे द्योतक आहे.पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मधील या उल्लेखाने गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांना, विशेषतः नक्षलवाद विरोधी मोहिमेला आणि त्यातून सामान्य नागरिकांना मिळत असलेल्या लाभांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular