VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १३ ऑगस्ट २०२५::- चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती करणारे गटई कामगार हे रस्त्याच्या कडेला उन्हा-पावसात बसून सेवा देतात. त्यांना ऊन, वारा व पावसापासून संरक्षण मिळावे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळावी, यासाठी शासनाच्या १०० टक्के अनुदानातून पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ आता ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रासोबतच अ वर्ग व ब वर्ग नगरपालिका, छावणी क्षेत्र (कॅन्टोन्मेंट बोर्ड) आणि महानगरपालिका क्षेत्रातील पात्रांना देखील मिळणार आहे.सामाजिक न्याय भवन येथे कार्यालयात या योजनेचे अर्ज उपलब्ध असून अनुसूचित जातीतील गटई कामगारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
अर्जासोबत अर्जदाराचा अधिकृत जातीचा दाखला, मागील आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड व आधारकार्डाच्या प्रत, अर्जदार ज्या जागेत स्टॉल उभारणार आहे त्या जागेचा भाडेपट्टा, करारनाम्याची प्रत किंवा खरेदी खत, ग्रामसेवक वा सचिव यांनी दिलेले गटई कामाचे प्रमाणपत्र, व्यवसाय प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय करतानाचा फोटो, तसेच अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज शासन निर्णयात नमूद अटींनुसार व विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक आहे.
पात्रतेचे निकष:-
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती संवर्गातील असावा. ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४० हजार रुपये व शहरी भागातील उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. स्टॉल उभारण्याची जागा ही संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा छावणी बोर्ड यांनी अधिकृतरीत्या भाड्याने, कराराने किंवा मोफत ताब्यात दिलेली असावी.या योजनेत पात्र अर्जदारांनी आपले परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
