VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मा.खा.डाँ.अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती,
नागपूर, ०७ सप्टेंबर २०२५::- कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था विदर्भ यांच्या माध्यमातून आदिवासी व नक्षल प्रभावित भागातील शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे उत्साहात संपन्न झाला.एकलव्य एकल विद्यालय सुरू झालेल्या या कार्यातून आतापर्यंत एकल विद्यालयांचे यशस्वीपणे संचालन होत आहे.
शिक्षक व पर्यवेक्षक यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, शैक्षणिक उपक्रमांना नवे आयाम लाभावेत यासाठी दि. ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या समारोप कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग भारत सरकार माननीय श्री. नितीनजी गडकरी, आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोकजी उईके, नोबेल पारितोषिक विजेते कैलासजी सत्यार्थी, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, आमदार संजयजी पुराम,आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले, आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच संस्थेचे अध्यक्ष मान. अतुलजी शिरोडकर,माजी आमदार केशवराव मानकर, नागपुर च्या माजी महापौर मायाताई इवनाते,रेखाताई मावस्कर, संजयजी भेंडे, संजयजी फांजे, उपाध्यक्ष मान. राजीव हडप, मान. मुरलीधर चांदेकर, सचिव मान. प्रशांत चोपर्डीकर, कोषाध्यक्ष मा. मिलिंद कानडे तसेच कार्यक्रमाचे संचालन विरेंद्रजी अंजनकर यांनी केले.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना नोबेल पारितोषिक विजेते कैलासजी सत्यार्थी म्हणाले :“नोबेल पुरस्कार मला मिळाला तो केवळ माझ्यासाठी नव्हे, तर भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. हा पुरस्कार भारतमातेच्या चरणी अर्पण आहे. जगातील १४४ देशांत मी फिरलो, अनेक संघर्ष, अडचणी अनुभवल्या,पण समाजकार्याच्या वाटेवर कधीच थांबलो नाही.

रवींद्रनाथ टागोर व सी. व्ही. रमण यांच्या नंतर मला हा सन्मान लाभला आणि मी हा गौरव सर्व भारतीयांचा आहे असे मानून राष्ट्रपती भवनातच अर्पण केला.”त्यांचे शब्द ऐकून उपस्थित शिक्षक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व प्रेरणा संचारली.या समारोप सोहळ्याचे अध्यक्षीयस्थानी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी म्हणाले :“कै. लक्ष्मणजी मानकर यांनी आयुष्यभर वंचित, दलित व शोषित घटकांसाठी निःस्वार्थी कार्य केले. त्यांनी भवभुती संस्थेपासून ते एकलव्य विद्यालयांपर्यंत आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी पायाभूत कार्य केले. आज शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी विशेष गुण, काहीतरी हुनर असतो. शिक्षणाच्या माध्यमातून त्याचा विकास घडवून आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”त्यांनी पुढे भावपूर्ण भाषेत सांगितले :“सूर्य मावळला, चंद्र लुप्त झाला, तारे हरवले तरी दीप म्हणतो – माझे कार्य आहे उजेड देण्याचे, प्रकाश पसरवण्याचे. तसेच आपणही शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातून अंधारात प्रकाश पसरवण्याचे कार्य अखंडपणे करत राहिले पाहिजे.” गडकरींच्या या प्रभावी भाषणाने उपस्थितांना शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्व नव्या जोमाने पटवून दिले.एकलव्य विद्यालयांचे कार्य हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून आदिवासी भागातील सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखवणारे आहे. या प्रशिक्षण वर्गाने शिक्षकांना नव्या उमेदीनं कार्य करण्याची प्रेरणा दिली. मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने संस्था व शिक्षकांचे कार्य अधिक वेगाने पुढे जाणार यात शंका नाही.
