VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली शहरात महिला–बालभिक्षेकरी वाढले,
भिक्षावृत्ती थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी ,
सागर निंबोरकर, सामाजिक कार्यकर्ते
गडचिरोली ,०७ जानेवारी २०२६::- गडचिरोली शहरात अलिकडच्या काळात महिला आणि लहान बालकांसह भिक्षावृत्तीचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यामुळे शहरातील सामाजिक सुरक्षितता, बालकांचे भवितव्य तसेच नागरी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि वाहतूक सिग्नलवर महिलांनी लहान मुलांना हातात घेऊन भिक्षा मागण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे.
या चिंताजनक परिस्थितीवर लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते सागर निंबोरकर यांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
बालकांच्या सुरक्षिततेला वाढता धोका:-
रस्त्यावर भटकंती, उन्हात-धुळीत तासन्तास भिक्षा मागणे, पोषण व स्वच्छतेचा अभाव—”
या सर्वामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, शोषणाची शक्यता वाढते आहे.
बालकांना शाळेबाहेर ठेवून भिक्षावृत्तीत ढकलण्याचा प्रकार मानवी हक्कांचे उल्लंघनच असल्याचे निंबोरकर यांनी नमूद केले.
(प्रमुख मागण्या)
१) महिला व बालभिक्षेकर्यांची नोंदणी व योग्य पडताळणी:-
शहरात भिक्षा मागणाऱ्यांची अधिकृत यादी तयार करून त्यांची खरी गरज, पार्श्वभूमी व शोषणाची शक्यता तपासावी.
२) बालकांच्या संरक्षणासाठी तात्काळ हस्तक्षेप:-
बालकल्याण समितीमार्फत मुलांना संरक्षणात घेणे, पोषण, आरोग्य तपासणी आणि शिक्षणाची सोय करणे, मुलांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई.
३) महिलांसाठी पुनर्वसनाचा ठोस मार्ग:-
आश्रय, रोजगार, स्वयंरोजगार गट, कौशल्य प्रशिक्षण, सार्वजनिक वितरण प्रणाली यांची जोड देऊन महिलांना भिक्षावृत्तीमुक्त करणे.
४) संयुक्त कारवाई मोहीम:-
नगरपरिषद, पोलीस, बालकल्याण समिती व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे शहरात नियमित मोहीम राबवावी.
५) “भिक्षा नको – सहाय्य द्या” जनजागृती:-
चौकात फलक, रस्त्यातील मोहीमा, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य वाढवून नागरिकांना जबाबदार सहभागासाठी प्रोत्साहित करणे.
“भिक्षावृत्ती निर्मूलन म्हणजे समाजाचा सन्मान व बालकांचा हक्क”
सागर निंबोरकर म्हणाले:- “भिक्षावृत्ती थांबवणे म्हणजे फक्त कारवाई नव्हे, तर मुलांचे भविष्य, महिलांचा सन्मान आणि मानवतेचे संरक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. प्रशासनाने आता तरी ठोस, परिणामकारक निर्णय घ्यावेत.”
गडचिरोली शहर भिक्षावृत्तीमुक्त, सुरक्षित आणि मानवी मूल्यांनी समृद्ध होण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी त्यांनी ठाम मागणी केली आहे.
