VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करू – जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे,
गडचिरोली/चामोर्शी, १४ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी भेंडाळा परिसरातील शेतकरी बांधवांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या विविध समस्या, प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प तसेच शेतीसंदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी आपली जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला असूनही शासनाकडून जबरदस्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली असतानाही काही अज्ञात व्यक्तींकडून परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण व इतर हालचाली सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी बळजबरीने अधिग्रहित करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही.”
या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निकेश गद्देवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, हेमंत मोहितकर, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोज पोरटे, सुधीर सोमणकर, सरपंच सुनील कन्नाके, साईनाथ चौधरी, विनायक चलाख, डोईजड पाटील, पोरटे पाटील, किनेकर पाटील, नेहाल आभारे, अक्षय पोरटे, स्वप्नील पुटकमवार तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
