VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,२५-०१-२०२४::- वैनगंगेच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि वाऱ्याने नाव उलटून सहा महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी घडली. नावाडयाने स्वतःसह एका महिलेचे प्राण वाचविले. वाहून गेलेल्या तीन महिलांचे मृतदेह सापडले असून अद्यापही तिघींचा शोध लागलेला नाही. गावातील सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याने संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात रोजगार नसल्याने हे संकट ओढवल्याची चर्चा गावात आहे.
नाव उलटल्याने गणपूर येथील पुष्पा मुक्तेश्वर झाडे, जिजाबाई दादाजी राऊत, रेवंता हरीचंद्र झाडे, सुषमा सचिन राऊत, मायाबाई अशोक राऊत, बुधाबाई देवाजी राऊत यांना जलसमाधी मिळाली. यापैकी पुष्पा झाडे, जिजाबाई राऊत यांचा मंगळवारी तर बुधवारी रेवंता हरीचंद्र झाडे हिचा मृतदेह आढळून आला. मात्र अद्यापही तीन महिलांचा थांगपत्ता लागलेला नाही. मृत पावलेल्या पुष्पा झाडे यांचे पती मुक्तेश्वर झाडे हे गावाचे पोलिस पाटील आहेत. पुष्पा गेल्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे. मृतक जिजाबाई यांचे पती दादाजी राऊत शेतमजूर असून जिजाबाईच्या जाण्याने दोन मुले आईपासून पोरकी झाली आहेत. तर रेवंता झाडे यांना एक मुलगा, एक मुलगी असून मुलीचे लग्न जुळल्याने तारीख काढण्यासाठी त्यांचे पती बाहेरगावी गेले होते. मुलीचे लग्न पाहण्याआधीच रेवंताने परलोकी गेल्याने झाडे कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला आहे. बुधाबाई राऊत यांना 22 वर्षाचा मुलगा असून दोन मुलींचे लग्न झाले आहेत. त्यांचे देवाजी राऊत यापूर्वीच मृत्यू पावले. वडीलांपाठोपाठ आईही गेल्याने मुले पोरकी झाली आहेत. भूमिहीन असलेले सचिन राऊत यांची सुषमा पत्नी असून माया अशोक राऊत यांची आई आहे. आई व पत्नी दोन्ही नियतीने हिरावल्याने सचिन राऊत यांची दोन चिमुरडी मुले आई व आजींच्या मायेच्या सावलीपासून पोरकी झाली. आता घरात सचिन व अशोक बापलेकांसह दोन लहान बालके असे चौघेच घरात उरले आहेत. एकंदरीत गावातील सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याने सदर सहाही कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावातही स्मशान शांतता पसरली आहे. उद्योगविरहित जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर बाहेर राज्यात व बाहेर जिल्ह्यात नेहमीच जात असतात. मात्र शासन, प्रशासन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात कमी पडत असून यातून अपघाताच्या घटना घडल्याची ग्रामीण भागात चर्चा आहे.
कुठलीही सूचना न देता चिचडोह बॅरेजचे पाणी सोडण्यात आले. यामुळे वैनगंगेची पातळी वाढली. याची पूर्वकल्पना प्रशासनाने ग्रामस्थांना दिली असती तर मृत्यू टाळता आले असते. प्रशासनाच्या चुकीमुळे ही घटना घडली असली असून याची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या नातेवाइकांना प्रत्येकी दहा लाख आर्थिक मदत द्यावी.
सुधाकर गद्दे, सरपंच, गणपुर,
शेतीला पाणी देऊन शेतकरी सक्षम करणे चिचडोह बॅरेजचा उद्देश असताना पाण्याच्या एकाही थेंबाचा शेतीसाठी उपयोग होत नाही. उलट पाणी जास्त झाले की कोणतीही माहिती न देता पाणी सोडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या पाण्यात मोटारपंप, शेतीउपयोगी साहित्य पाण्यात वाहून जात आहे. प्रशासनाच्या चुकीमुळेच गणपुरच्या सहा महिलांचा बळी गेला. यापूर्वीही वाघोली येथील 3 विद्यार्थिनी बुडून मरण पावल्या होत्या.
प्रमोद भगत – चामोर्शी काँग्रेस तालुका अध्यक्ष.
