
VAINGANGA NEWS 24
प्रतिनिधी – दिलखुश बोदलकर (वा.)
गडचिरोली/लखमापूर बोरी,२० ऑगस्ट २०२४::- लखमापूर बोरी गावच्या गुराख्याने दि. 18 ऑगस्ट, रविवार ला जंगलात गायी चरायला नेले असता सायंकाळी गायी परत आणत असताना गावाच्या आग्नेय दिशेस असलेल्या नाल्याला पाणी ओसंडून वाहत होता, गुराख्याने नेहमीप्रमाणे गायी नाल्यातून आणत असताना तिथे गावातीलच काही मासेमाऱ्यांनी मासेमारी करिता मोठे कोतरा जाळे लावून ठेवलेले होते आणि ह्याच जाळ्यात तीन गायी अडकून तडफडू लागल्याने गुराखी साईनाथ वासेकर यास लक्ष्यात येताच त्याने जाळ्याचे एका बाजूचे दोर कापून टाकले असता दोन गायी कसेबसे बाहेर निघाले मात्र तोपर्यत सर्वांत अगोदर फसलेल्या गायीचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. जाळ्यात अडकून मरण पावलेल्या गायीचे मालक विलास माळोजी सुरजागडे यांस गुराख्याने गावात येऊन माहिती दिल्यानंतर मालकाच्या डोळ्यातून चक्क दुःखाश्रू वाहू लागले. याचे कारण ती गाय गाभण होती. म्हणजेच दोन जीवाचा मृत्यू झाल्याची वार्ता ऐकून मन सुन्न झाले. सायंकाळी 6:30 वाजता घटनास्थळी तलाठी ओ. डी. शहारे, कोतवाल जनार्धन जवादे, गुराखी व काही गावकऱ्याच्या उपस्थितीत गायीला कोतरा जाळ्यासकट पाण्याबाहेर काढण्यात आले. मासेमारी साठी वाहत्या पाण्यात मोठे कोतरा जाळे लावून स्वतः बेजवाबदारीने पसार झाल्याने गुराख्याला व गायीला जाळ्याचा अंदाज समजला नाहीं व अखेर ही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे गाभण गायीच्या मृत्युचा सर्वस्वी जवाबदार हा मासेमारी करणारा व्यक्ती असुन त्याने गाय मालकास नुकसान भरपाई द्यावी व वाहत्या पाण्यामुळे गायी जाळ्यात जाऊन लटकल्या मुळे गायी मरण पावली त्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.
