VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, ०१ मे २०२५::- जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, पोर्ला येथील शेतकरी श्री. गजानन डोंगरवार यांच्या शेतात नुकसानीचा प्रकार घडला. मात्र, वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने श्री. डोंगरवार यांनी काल सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत सहपालकमंत्र्यांनी वन विभागाला तात्काळ संबंधित अर्जावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, वन विभागाने श्री. डोंगरवार यांना नुकसान भरपाई मंजूर करत तासाभरातच मदतीचे आदेश जारी केले.या पार्श्वभूमीवर श्री. डोंगरवार यांनी आज विश्रामगृह येथे सहपालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी श्री. जयस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “वन विभागाने सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती अधिक संवेदनशील राहावे आणि त्यांना शासकीय मदत तत्काळ द्यावी.”
