VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १६ सप्टेंबर २०२५::- गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा (माल) या गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटना घडली. गावातील रहिवासी वामन मारोती गोडाम यांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी आणि परिसरासाठी दुःखदायक आहे. नैसर्गिक आपत्तींच्या स्वरूपात हत्तींच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान सोबत जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी चुरचुरा (माल) गावास प्रत्यक्ष भेट दिली.

वामन गोडाम यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले आणि दुःखाच्या या प्रसंगी शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. खासदार डॉ. किरसान यांनी घटनास्थळी वनविभागाच्या हलगर्जीपणाचा तीव्र निषेध व्यक्त करत, अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे मागणी केली की, ज्या ठिकाणी हत्तींचा वावर जास्त आहे, त्या गावांमध्ये हत्ती प्रतिबंधक उपाययोजना, बाधित कुटुंबांना आर्थिक मदत, आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या दौऱ्यात त्यांच्यासोबत वसंत राऊत तालुकाध्यक्ष गडचिरोली, सुधीर बाबोळे, नितेश राठोड, जावेद खान, काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच शशांक कुलसंगे पोलीस पाटील चुरचुरा,नामदेव खोब्रागडे, हीराम उरकुडे, डी.एन. मेश्राम, मिनताभ मेश्राम,रामचंद्र नैताम, किशोर धाकडे (नवरगाव), नारायण नैताम (चुरचुरा), पुरुषोत्तम आलाम, भीमराव कोसे, शंकर नैताम आणि गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
