VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
सावित्रीबाई फुले जयंती व नववर्ष २०२६ निमित्त पोलीस भरती महालेखी स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न!,
गडचिरोली ,०४ जानेवारी २०२६::- इंदिरानगर येथे सावित्रीबाई फुले जयंती व नववर्ष २०२६ चे औचित्य साधून SM स्पर्धा परीक्षा केंद्र, इंदिरानगर, गडचिरोली यांच्या वतीने दि. ०३/०१/२०२६ रोजी (शनिवार) पोलीस भरती महालेखी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण सोहळा दि. ०४/०१/२०२६ रोजी (रविवार) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ. मिलिंदभाऊ नरोटे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. योगिता प्रमोद पिपरे (जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी, गडचिरोली तथा माजी नगराध्यक्षा) यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच मा. श्री. प्रमोद पिपरे (भाजपा लोकसभा समन्वयक तथा संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे), मा. रमेश भुरसे (प्रदेश सचिव, भाजपा किसान मोर्चा), मा. श्री. अनिल कुणघाडकर (भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक), मा. श्री. हर्षल गेडाम (नगरसेवक) व मा. श्री. अनिल तिडके यांची उपस्थिती होती.
यावेळी स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यशस्वी स्पर्धकांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
सौ. योगिता प्रमोद पिपरे यांचे प्रेरणादायी व दिशादर्शक मार्गदर्शन:-
कार्यक्रमात सौ. योगिता प्रमोद पिपरे यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पोलीस भरती ही केवळ नोकरी मिळविण्याची प्रक्रिया नसून ती समाजसेवा, शिस्त आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तयारी केली पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला परिवर्तनाची दिशा दिली; त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे.”
त्यांच्या या ओघवत्या व आत्मविश्वास वाढविणाऱ्या विचारांनी उपस्थित स्पर्धकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे नव्याने प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची मजबूत परंपरा:-
या संपूर्ण उपक्रमाचे संचालक व मार्गदर्शक स्वप्नील मडावी सर यांनी स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन व आत्मपरीक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. उपस्थित मान्यवरांनी SM स्पर्धा परीक्षा केंद्र व आयोजकांचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
