VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेत युवा शक्तीने राष्ट्रहितासाठी पुढे यावे – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,
गडचिरोली ,१९ फेब्रुवारी २०२६::- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, सुशासन व सर्वसमावेशक विचारांमधून प्रेरणा घेत युवा पिढीने राष्ट्रहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा भवन येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य पदयात्रा प्रसंगी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्तेसमशेर खान पठाण यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडे पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी सर्व समाजघटकांना सोबत घेत स्वराज्य उभारले. आजच्या काळातही सर्वांना समान संधी देत, एकात्मतेच्या भावनेतून “नवीन गडचिरोली” घडविण्याची गरज आहे. शासन देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्नशील असून, या वाटचालीत प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
भव्य पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग :-

जिल्हा क्रीडा संकुल येथून भव्य पदयात्रेला सुरुवात झाली. शहरातील एल.आय.सी.चौक, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय याप्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही पदयात्रा शासकीय विश्रामगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समारोपास आली.

यावेळी पदयात्रेदरम्यान “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. देशभक्ती, शौर्य व स्वाभिमानाचा संदेश देणाऱ्या या घोषणांमुळे वातावरणात उत्साहाची लहर निर्माण झाली होती.

पदयात्रेपूर्वी एन.एस.एस., स्काऊट अँड गाईड तसेच विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या पदयात्रेत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
