VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
उद्योग प्रकल्पाविरोधात तीव्र नाराजी,
गडचिरोली /आष्टी,१८ फेब्रुवारी २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग प्रकल्पांचा विस्तार वेग घेत असताना चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथे नव्या वादाला तोंड फुटले आहे. जिल्ह्यातील एकमेव कागद कारखाना अखेरच्या घटका मोजत असतानाच तो लोहखनिजावर आधारित उद्योग कंपनीकडे हस्तांतरित केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अधिकृत घोषणा अद्याप नसली तरी कंपनी परिसरात बाहेरील कामगारांची वर्दळ वाढल्याची चाहूल लागताच इल्लूरवासीयांनी आक्रमक भूमिका घेत रोजगारावर पहिला हक्क स्थानिकांचाच असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
ईल्लुर येथील शेतकऱ्यांनी कागद कारखान्याला 1990 मध्ये जमिनी दिल्या मात्र एक जेमतेम एका पिढीला रोजगार मिळाला आणि कागद कारखान्याला अखेरची घरघर लागली व दुसरी पिढी बेरोजगार राहिली. हक्काची शेतकऱ्यांची जमीन कंपनीच्या मालकीची झाली. आता बिल्ट कंपनीने ही जागा लोहखणीज कंपनीला विकली कि लिज वर दिली हे गुलदस्त्यात आहे.
या अनिश्चिततेमुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळेल का, याबाबत स्पष्ट धोरण जाहीर न झाल्याने संताप वाढत आहे. बाहेरील कामगारांची नेमणूक सुरु झाल्याच्या चर्चानंतर इल्लूर येथील नागरिकांनी हल्लाबोल करत तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. “स्थानिक युवकांना डावलून उद्योग उभा राहणार नाही. कोणताही प्रकल्प सुरु करायचा असेल तर रोजगारात प्रथम प्राधान्य स्थानिकांना द्यावे,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
