VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,३० जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 30 जुलै 2026 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्ग बंद असल्याची माहिती दिली आहे.
बंद असलेल्या मार्गांमध्ये गडचिरोली–धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाला, आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम व टेकमपल्ली नाले, आष्टी–आलापल्ली मार्गावरील दीना नदी, चामोर्शी–आष्टी मार्गावरील सोनापूर परिसर, कुरखेडा–वैरागड मार्गावरील सती नदी, कोरची–बोटेकसा मार्गावरील भिमपूर नाला तसेच एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, आरमोरी आणि चामोर्शी तालुक्यांतील अनेक पूल व नाल्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पूरस्थितीमुळे दुर्गम भागांतील गावांचा संपर्क तात्पुरता तुटला असून नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदी, नाले आणि पुलांवरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून मार्ग ओलांडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच संबंधित मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत.
