VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,०२-०२-२०२४::-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी आज अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केले. देशाच्या सर्व समाजघटकांच्या आणि सर्व क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून पुढील काळात देशाच्या विकासाची दिशा स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
गेल्या साडेनऊ वर्षात केंद्र सरकारने विविध क्षेत्रांच्या उन्नतीसाठी अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. त्यात आता सौरउर्जेचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये दिले. त्यामुळे सौरउर्जेची महागडी उपकरणे केंद्र सरकारच्या सबसिडीतून नागरिकांच्या घरांवर लागून त्यांचा वीज बिलाचा खर्च बराच कमी होईल.
सरकारच्या दूरदृष्टीमुळे युवा वर्ग, महिला, शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. हा विद्यमान सरकारचा अंतरिम बजेट असला तरी पुन्हा मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारच सत्तेवर येऊन नव्या उमेदीने पुन्हा देशाच्या विकासाला उभारी देणारा अर्थसंकल्प सादर करेल, असा विश्वासही खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.
