VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, २३ जून २०२५::- रोजी भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून “शाळा प्रवेशोत्सव” मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या गुच्छांनी स्वागत करण्यात आले. याशिवाय, त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेली कम्पास पेटी भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि उत्साह कार्यक्रमाच्या यशस्वीतेची साक्ष देत होते.

या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. शाहीन ताई हकीम (विभागीय अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गट आणि अध्यक्षा, दृष्टी फाउंडेशन, अहेरी) उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा मूळ आधार आहे, आणि विद्यार्थी हे त्या परिवर्तनाचे वाहक आहेत.
मा. शाहीन ताई यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना उदंड शुभेच्छा दिल्या आणि दृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, महिला सक्षमीकरण व समाजकल्याणासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांच्या मनात नवी ऊर्जा भरून गेले.
या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य शहीद सर व प्राध्यापक वर्ग, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच काही पालक व ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
