VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
DAP-युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी,
माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात कृषी विभागाविरोधात निषेध,
गडचिरोली /अहेरी,०९ २०२६::- प्रतिनिधी : खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटूनही शेतकऱ्यांना DAP व युरिया खताचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अहेरी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), अहेरी विधानसभा यांच्या वतीने सोमवार, 13 जुलै 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता तालुका कृषी कार्यालय, अहेरी येथे ‘चष्मा भेट आंदोलन’ करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम करणार आहेत. कृषी विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नसून पेरण्या, पिकांची वाढ आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.
आंदोलनादरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात चष्मा भेट देण्यात येणार आहे. “अधिकाऱ्यांचे डोळे असूनही त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी दिसत नाहीत. त्यामुळे ‘चष्मा लावा, शेतकऱ्यांचे दुःख बघा’ असा संदेश देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे,” असे आयोजकांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), अहेरी विधानसभा यांच्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
