VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोलीत सत्कार, आढावा बैठक आणि नव्या नियुक्त्यांची घोषणा,
गडचिरोली,०२ ऑगस्ट २०२६::- अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नरेंद्र उंदीरवाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर गडचिरोली येथील सर्किट हाऊसमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आढावा बैठक पार पडली. राष्ट्रीय संघटन महामंत्री तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत डॉ. उंदीरवाडे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत आगामी कार्यासाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी SC/ST समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेची राज्यभर मजबूत उभारणी करण्याची गरज अधोरेखित केली. वंचित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत सामाजिक न्यायाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटनेचे कार्य गावागावापर्यंत पोहोचवून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत संघटन विस्ताराला गती देण्यासाठी विविध पदांवर नियुक्त्यांची घोषणाही करण्यात आली. अमोल कुळमेथे यांची प्रदेश सचिव, डॉ. मिलिंद रामटेके यांची विदर्भ अध्यक्ष, ज्योती उंदीरवाडे यांची जिल्हा संघटिका, तर हंसराज उराडे यांची गडचिरोली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, महिला प्रदेश प्रमुख अॅड. कविता मोहरकर, प्रदेश महासचिव डॉ. कुणाल कोवे, गौतम मेश्राम, वर्षा रामटेके, जितेंद्र रायपुरे, डॉ. कैलास नगराळे, शिल्पा आचला, भावना दरडे, संजय कुमरे, नितेश उंदीरवाडे, राजेश कोत्तावार, निखिल धार्मिक, ओमप्रकाश साखरे, मिलिंद बांबोडे, जगदीश सहारे, कल्पना नरोटे, उमेश भांडेकर, हिटलर गिरडकर, दिपक देवतळे, प्राणजित वाकडे, तेजराम गोंगले, परिजन दहिवले, पंकजकुमार सिंग, सर्जन चव्हाण, संजय कोचे, तेजकिरण उराडे, पुरुषोत्तम रामटेके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत संघटनेच्या आगामी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. SC/ST समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबरोबरच संघटनात्मक विस्तार, सामाजिक न्याय आणि समाजहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी राज्यभर व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
