VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
डॉ. अजय कंकडालवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी,
गडचिरोली /अहेरी,०२ ऑगस्ट २०२६::-तब्बल 52 दिवसांनंतर चंद्रपूर कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांचे अहेरी शहरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहिल्याने अहेरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर डॉ. कंकडालवार कारागृहाबाहेर आले. त्यांच्या सुटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अहेरीत आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

यानंतर त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. अजय कंकडालवार यांनी कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. समाजहित आणि जनसेवेची माझी वाटचाल यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील,” असे सांगितले.
डॉ. कंकडालवार यांच्या सुटकेनंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
