VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महावितरणच्या मनमानीविरोधात जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन,
गडचिरोली ,२७ ऑगस्ट २०२६::- स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव वीजबिले आणि महावितरणच्या कथित मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात महावितरणविरोधात आंदोलन करण्यात आले.
स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येऊ नये, ग्राहकांना अवाजवी वीजबिलांचा भुर्दंड देऊ नये, तसेच वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गरीब कुटुंबांवर वाढीव वीजबिलांचा आर्थिक भार पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, वाढीव वीजबिले रद्द करा आणि ग्राहकांना न्याय द्या,” अशी मागणी करत महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहणार असल्याचे सांगितले. ग्राहकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार सुरू राहिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनामुळे स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव वीजबिलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महावितरण प्रशासनाकडून याबाबत काय कार्यवाही केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
