VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
इटियाडोह धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी ,
गडचिरोली/आरमोरी,१७ जुलै २०२६::- जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे धान पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदासजी मसराम यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनातून इटियाडोह धरणातून तातडीने सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी अनेक भागांतील धान पिके करपण्याच्या स्थितीत असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार मसराम यांनी केली.
शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवून इटियाडोह धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून सिंचनासाठी पाणी सोडावे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आमदार मसराम यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून, यावेळीही शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही मागणी केली आहे. आता प्रशासन या मागणीवर कितपत लवकर निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
