VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
सहा महिने उलटूनही पंप बसविण्यास विलंब; मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्ष आक्रमक,
गडचिरोली /मुलचेरा,१९ ऑगस्ट २०२६::- मुलचेरा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी शासनाकडे आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम भरून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने सोलर पंप बसवून द्यावेत, अशी मागणी मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने आलापल्ली येथील विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम ऑनलाइन पद्धतीने शासनाकडे भरली. मात्र सहा महिने उलटूनही विद्युत विभागाकडून सोलर पंप बसविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली नाही.
पंप बसविण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून सिंचनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी रक्कम भरल्यानंतरही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विद्युत विभागाने तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसवून द्यावेत. अन्यथा आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लवकरच बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी दिला.
यावेळी हरिदास तोरे, साईनाथ सेडमाके, भुरू पेंदाम, रोशन मडावी, गुरुदास सेडमाके, आशिष पेंदाम यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
