VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मागणी,
गडचिरोली ,२७ ऑगस्ट२०२६::- ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधताना पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुतर्फा नियोजनबद्ध बहुउपयोगी वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक हवामान व मातीला अनुकूल असलेल्या आंबा, चिंच, मोह, ताड, कडुलिंब, वड, पिंपळ, आवळा, निलगिरी, चिकू, बदाम आदी बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्याची सूचना डॉ. होळी यांनी केली आहे.
या उपक्रमामुळे रस्त्यांचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संवर्धन, तापमान नियंत्रण आणि जैवविविधतेच्या संरक्षणाला चालना मिळेल. तसेच भविष्यात फळे, बिया, फुले व इतर वनउपजांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीलाही हातभार लागू शकतो.
ग्रामपंचायत, बचत गटांना संगोपनाची जबाबदारी :-

लावलेल्या वृक्षांचे संरक्षण व संगोपन केवळ शासकीय यंत्रणेपुरते मर्यादित न ठेवता स्थानिक ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि युवक मंडळांच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी सूचनाही डॉ. होळी यांनी केली आहे. त्यामुळे वृक्षलागवड अभियानापुरती न राहता त्यांचे दीर्घकालीन संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’मध्ये पर्यावरण आणि रोजगारनिर्मितीचा समन्वय साधणारा हा उपक्रम जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे PWD अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा बहुउपयोगी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा विशेष कार्यक्रम राबवून त्यासाठी आवश्यक निधी, नियोजन आणि प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

