VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची विद्युत विभागाने घेतली दखल,
गडचिरोली /मुलचेरा, 10 सप्टेंबर 2026::-मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील सोलर पंपासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. शासनाकडे अग्रीम रक्कम भरून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही सोलर पंप बसविण्यात आले नव्हते. याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत विद्युत विभागाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपाचे साहित्य पोहोचविले आहे.
मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीने शासनाकडे जमा केली होती. मात्र, त्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्याची कार्यवाही रखडली होती. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
या समस्येची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन सोलर पंप तातडीने बसविण्याची मागणी केली होती. तसेच, विलंब सुरूच राहिल्यास आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या इशाऱ्यानंतर विद्युत विभागाने हालचाली सुरू करत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपाचे साहित्य पोहोचविले आहे. लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, लाभार्थी भुरू गंगा पेंदाम, गुरुदास गोविंदा सेडमेक यांच्यासह एटापल्ली व चामोर्शी तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी या पाठपुराव्यासाठी भाई चिरंजीव पेंदाम तसेच विद्युत विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.
