VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /भामरागड,२४ ऑगस्ट २०२६::- जुलै अखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार निश्चित करण्यात आलेल्या ५०० पूरग्रस्त कुटुंबांना खासगी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे किट वितरित करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे भामरागड परिसरात पूरस्थिती गंभीर बनली होती. पुराचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने सुमारे ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली होती.
पूरस्थिती ओसरल्यानंतर तहसील प्रशासनाने बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार मदतीसाठी ५०० कुटुंबांची निवड करण्यात आली. या कुटुंबांना वितरित करण्यात आलेल्या किटमध्ये तांदूळ, गहू, तूरडाळ, पोहे, साखर, खाद्यतेल, मीठ, मसाले, साबण, केसांचे तेल आणि ब्लँकेट आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी २०० स्टेशनरी किटचेही वाटप करण्यात आले.
पूरग्रस्त कुटुंबांना संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास हातभार लागणार असून, प्रशासन व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी तहसीलदार किशोर बागडे, नायब तहसीलदार राजीव निखत, तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच टाटा स्टील फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
